तांबवे (प्रतिनिधी):आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे तांबवे गावाने संपूर्ण समाजासमोर 'सर्वधर्म समभावाचा' एक देदीप्यमान आदर्श ठेवला आहे. गावातील मंदिर आणि मशीद यांच्यात अवघ्या १५ ते २० फुटांचे अंतर आहे, परंतु येथील ग्रामस्थांच्या मनात मात्र धर्माचे कोणतेही अंतर उरलेले नाही. १६ वर्षांची परंपरा जपत, यंदाही मुस्लिम समाजाने अखंड हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून माणुसकी आणि एकात्मतेचे दर्शन घडवले.
तांबवे गावात गेल्या १६ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा केला जातो. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षीप्रमाणे एका दिवसाच्या कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाची संपूर्ण जबाबदारी गावातील मुस्लिम बांधव आनंदाने स्वीकारतात.यंदाही हाच वारसा पुढे नेत, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत भक्तीचा हा सोहळा साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहसान कृषी सेवा केंद्राचे युवा उद्योजक एजाज शेख, सतीश कोळेकर माजी उपसरपंच, क्रिएशन पेस्टिसाइड, मुस्लिम समाजाचे जिलानी शेख, तसेच लतीफ शेख, कानिफ लवटे, मोनम शेख, असिफ अली शेख, दशरथ लवटे, सलीम खान, अस्लम मुलाणी, शब्बीर मुल्ला, जब्बार शेख आणि अब्दुल गणी शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.


